वायरमन : वादळ-वाऱ्यात तो लढतो खंबीर… त्याच्या सेवेला द्या थोडा आदर आणि धीर
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
अवकाळी वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मर बिघडणे यामुळे अनेक ठिकाणी तासन्तास अंधार पसरतो. अशा बिकट परिस्थितीत वायरमन कर्मचारी जीव धोक्यात घालून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी झटत असतात. मात्र त्याचवेळी लाईट कधी येणार म्हणून अनेक नागरिकांचे कॉल त्यांच्या फोनवर धडकत असतात.
वादळात तारा तुटणे, शॉर्टसर्किट होणे, खांब वाकणे अशा घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसात आणि विजेच्या धोकादायक परिस्थितीत वायरमनना खांबावर चढून तारा जोडाव्या लागतात, तर कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड असल्यास तिथेही काम करावे लागते. हे काम अत्यंत दक्षतेने आणि सावधगिरीने करावे लागते.
विजेचा खंडित पुरवठा पाहून अनेक नागरिक त्वरित वायरमनना फोन करून तक्रारी करत असतात. हे फोन कधी कधी वायरमन खांबावर काम करत असताना येतात, ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. “फोन उचलताना अपघात होऊ शकतो, अशा प्रसंगी संयम बाळगणे फायदेशीर ठरू शकते.
रात्री वीज गेल्यास उकाड्यामुळे झोप न लागल्याने नागरिक तक्रारी करतात, मात्र त्याच वेळी हेच वायरमन आपल्या झोपेची तमा न बाळगता, इतरांच्या झोपेसाठी कार्यरत असतात. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून वायरमन कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात सहकार्य करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मान्य केले पाहिजे.
पाऊस थांबताच आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचतो. खांबावर चढून वायर हाताळणे हे काम जीवावर बेतणारे असते. अशा वेळी नागरिकांकडून सतत फोन येतात. आम्ही फोन उचलू शकलो नाही, तर काहींची नाराजी होते. पण फोन उचलण्याच्या घाईत अपघात होऊ शकतो. नागरिकांनी कृपया संयम बाळगावा. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत आहोत.
….. अनिल गोबाळे, वायरमन, टाकळी हाजी.